फुले-आंबेडकरी तत्त्वज्ञान व वैज्ञानिक दृष्टिकोन
महाराष्ट्र ही प्रगतिशील व पुरोगामी जविचारचळवळीचं बीजारोपण करणारी भूमी म्हणून ओळखली जाते. या भूमीने समग्र भारतवर्षाला सुधारणावादाचा वारसा दिला. सुधारक व समाजबदल करू पाहणा-या कृतिशील विचारवंताचा वारसा लाभला आहे. या राज्यात संत गाडगेबाबांसारखा अंधश्रद्धानिर्मूलनाबरोबरच सार्वजनिक स्वच्छतेचा संदेश देणारा संत निर्माण झाला तर तुकडोजी महाराज यांनी राष्ट्रवादी विचार रूजवून राष्ट्रीय एकात्मता शिकवले.
भारतात ब्रिटीशांच्या जुलमी व्यवस्थेने जेव्हा सामाजिक व राजकीय जीवन व्यापले होते तेव्हा महात्मा जोतीरावांनी हंटर कमिशनपुढे भारतीय जनतेला सक्तीचे व मोफत प्राथमिक शिक्षण देण्याबाबतची लेखी मागणी केली व पुढे ती मंजूरही करून घेतली. समाजाच्या उच्चनीचतेचे मूळ असणा-या विषमतावादी परंपरेवर सडकून टीका केली. शेतक-याचा आसूड, ब्राम्हणांचे कसब, गुलामगिरी, सार्वजनिक सत्यधर्मपुस्तक यासारखे ग्रंथ लिहून समाजाला वैचारिक गुलामी सोडण्यासाठी विचारप्रवृत्त केले. स्त्री शूद्रांच्या अवनतीच्या कारणांचा आपल्या लिखाणातून समाजासमोर पाढा वाचला. सत्यशोधक चळवळीद्वारे 'सत्यशोधक विवाह पद्धती ' विकसित करून पारंपरिक विवाहसंस्थेला क्रांतिकारक धक्का दिला.


डॉ. बाबासाहेबआंबेडकरांनी महात्मा फुलेंना आपले वैचारिक गुरू मानले होते. म्हणून त्याच्या पाऊलवाटेवर चालत त्यांनी समाजातल्या पीडित व दलित घटकांना विमुक्त केले. जातिव्यवस्थेने वर्षानुवर्षे शूद्रातिशूद्र मानलेल्या अस्पृश्य मानलेल्या जातीला सन्मानाचा सार्वजनिक जीवन जगता येणे मुश्किल होते तेव्हा बाबासाहेबांनी महाड येथील चवदार तळ्याचं पाणी तमाम अस्पृश्य मानलेल्या महारजातीस खुलं केलं. मूकनायक, बहिष्कृत भारत, यासारख्या पाक्षिकांतून मूक समाजास वाचते-बोलते केले. मनुस्मृतीचे दहन करून स्त्री शूद्रांना नवी जीवनप्रणाली प्रदान करण्याची उद्घोषणा केली तर काळाराम मंदिरप्रवेशाचा नाशिक येथे घडवून हिंदू म्हणून हक्क मिळवण्याचा सनदशीर प्रयत्न केला. हिंदू धर्मांत आपल्या समाजाला समतेचा वागणूक मिळावा म्हणून त्यांनी खूप प्रतीक्षा केली. शेवटी १३ अॉक्टोबर १९३५ साली 'मी हिंदू म्हणून जन्मलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही ' अशी ऐतिहासिक घोषणा केली. तब्बल २१ वर्षे सुधारणेची वाट पाहत १४ ऑक्टोबर १९५६ साली नागपूर मुक्कामी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. लाखो अनुयायांना पारंपरिक धर्माच्या संहितेतून बाहेर काढून तथागत बुद्धांचा समाजवादी व विज्ञाननिष्ठ चिकित्साधम्म बहाल केला. थोडक्यात फुले आंबेडकर या द्वयीने भारतीय समाजात परिवर्तन करण्यासाठी स्वातंत्र्य, समता व बंधुतेचा महान संदेश रूजवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला. मानवतावादी दृष्टिकोण विकसित करून विज्ञाननिष्ठ विचारांचा पाया बळकट केला. त्यांचा हा विचार समग्र बहुजन समाजाची उन्नति साधण्यासाठी व जीवन जगण्याची नवदृष्टी देण्यात दिशादर्शक ठरला. नवसमाजनिर्मितीचा संकल्प पूर्ण करण्यासाठी समाजवादी धर्मनिरपेक्ष व प्रजासत्ताकाची आस बाळगणारी जीवनवादी तत्त्वप्रणाली त्यांनी विकसित केली. पुढे बहुत अभ्यासांती अनेक विद्वान व अभ्यासकांनी व्याख्यांकित करून त्याला *फुले आंबेडकरी तत्त्वज्ञान* अर्थात
*फुलेआंबेडकरवाद* म्हटले.युगानुयुगे भारतीय समाजजीवनास ग्रासून राहिलेल्या कर्मठ व सनातन विषमत संस्कृतिरक्षकांच्या तावडीतून मुक्त करणारे व समतावादी समाजविज्ञानी जीवन जगण्याचा सन्मार्ग प्रदान करणारे , परंपरेने आलेले दारिद्र्य, अज्ञान ,अंधश्रद्धा यांच्या़पासून मुक्ती देऊन विमुक्तीच्या निळ्या आभाळास भारी मारायची र सुसंधी देणारे, बुद्ध कबीरांच्या सम्यक विचारांचे अधिष्ठान देऊन विमुक्तीची चव चाखायला देणारे आधुनिक क्रांतिविद्न्यान म्हणजे *फुले आंबेडकरी तत्त्वज्ञान* अर्थात *फुलेआंबेडकरवाद* असे म्हणता येऊ शकेल.
या फुले आंबेडकरी तत्त्वज्ञानाचं संवर्धन करून जीवन जगण्याचा विधायक परिणाम आज समग्र भारतीयांच्या जीवनप्रवासात प्रतीत होतोय. समाजाचा हा वर्ग व जातीसमूह हे तत्त्वज्ञान आपला जीवनमार्ग म्हणून अंगिकारताना दिसतो. हा समूह अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपल्या शारिरीक व्याधींवर मात करत बाबासाहेबांनी जे भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून सार्थ ठरवले ते भारतीय संविधान सर्वार्थाने आदर्श मानते. त्यांचा असा दृढविश्वास आहे की मानवी समूहाचे कल्याण व विकास हो अंतिम उद्दिष्ट आहे व केवळ विवेकवादी चळवळीतून फलद्रूप होऊ शकते. समाजाची उच्चनीचतेचे समर्थन करून जातीप्रथा बळकट करू पाहणारे विषमतामूलक तत्त्वज्ञान वैज्ञानिक दृष्टिकोण विकसित करण्यात सपशेल असमर्थ ठरते. आधीप ण हे तत्त्वज्ञान मानवातील परस्पर मैत्रभाव जपायला~ शिकवण्याऐवजी भेदाच्या सीमारेखा गडद करू पाहते.म्हणून वैद्न्यानिक दृष्टिकोण विकसित चर्करण्यासाठी आधी एखाद्या घटनेकडे तटस्थ व वास्तव दृष्टीने पहावयास शिकला पाहिजे. त्याच्या साधकबाधक बाजूंचा तौलनिक अभ्यास करून अंतिम निष्कर्षाप्रत येताना कोणताही पूर्वग्रहदूषित दृष्टिकोण आड येता कामा नये. आर्किमिडिज़,पायथॅगोरस ,गॅलिलिओ,कोपर्निकस,लुई पाश्चर, होमी भाभा, जगदीशचंद्र बोस, क्युरी दांपत्य या सा-या विद्वानांनी वैद्यकीय व विज्ञानाच्या क्षेत्रात सत्यासाठी प्रसंगी प्राण दिले व अंतिमत: जगाने त्यांचे वैज्ञानिक सत्य स्वीकारले
त्यांनी आपल्या कृतीने हे दाखवून दिले की केवळ आपले पूर्वज एखादी कृती वा कर्मकांड करत होते म्हणून ते पार पाडण्यापेक्षा त्यात वैद्न्यानिक सत्यता किती आहे हे पडताळून पाहता येते.चिकित्सेच्या पातळीवर जे खरे ठरते ते सत्य स्वीकारण्याची मानसिक तयारी करता आली पाहिजे. नेमकी ही दृष्टी भारतीय माणसाला फुले आंबेडकरी तत्त्वज्ञानातून मिळते. केवळ बहुसंख्यांक समूहाची मान्यता मिळवत मोठी मानली जाणारी व्यक्ति बहुदा आत्मस्वार्थासाठी समूहाच्या अज्ञान व मानसिक गुलामीचा गैरफायदा उठवताना दिसते. म्हणून अशा लोकांपासून सावधगिरी बाळगत प्रश्न विचारण्याचं सामर्थ्य वैद्न्यानिक दृष्टिकोण देतो. फुले आंबेडकरी तत्त्वज्ञानाचं संवर्धन करणारा समूह समतेचा आग्रह धरत विज्ञाननिष्ठ जीवनप्रणालीचा आग्रह क"धरतो. त्यासाठी तो कोणतीही किंमत मोजायला तयार असतो. या तत्त्वांच्या टिकाऊपणासाठी त्याग करण्याची मानसिक तयारी दाखवतो. समतावादी व आदर्श भारतीय समाजासाठी वैज्ञानिक दृष्टिकोण प्रवर्धित करणारा व भारतीय संविधानाला त अपेक्षित स्वातंत्र्य ,समता , बंधुता व सामाजिक न्यायावर आधारित निकोप समाज तयार करू पाहणारा समाजच केवळ नवसमाजाचे स्वप्न फलद्रूप करू शकतो. म्हणुनच मला महात्मा फुले यांचे 'अखंड 'मधील हे वचन आदर्श वाटते
मानवाचा धर्म !
सत्य हिच नीती !
बाकीची कुनीती!
जोती म्हणे !!
*सिद्धार्थ गोपाळ तांबे*
*महात्मा फुले जयंती महोत्सवदिन*
*११ एप्रिल २०२०*
Abhiwaadan
ReplyDelete